हैदराबाद – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना भाजपच्या सापळ्यात न फसण्याचे आवाहन केले. नेत्यांना सावध करताना ते म्हणाले की, जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करा आणि वैचारिक स्पष्टता राखा, असे आवाहनही त्यांनी केले.
राहुल गांधी यांनी कार्यकारीणी सदस्यांना केलेल्या संबोधनाची माहिती पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की पक्षाच्या नेत्यांनी भारत मातेचा आवाज ऐकून लोकांच्या प्रश्नासाठी लढा देण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी उपस्थितांना केले.
पक्षाच्या नेत्यांनी वैचारीक स्पष्टता राखणे महत्वाचे आहे. भाजपचे लोक अनेक प्रकारचे सापळे रचतील, त्यात आपण अडकणार नाही याचीही दक्षता घेण्याची सुचना राहुल गांधी यांनी केली.
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवर भाजपने जोरदार टीका केली आहे, त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही सुचना केल्याचे मानले जात आहे.
कार्यकारणीत झालेल्या चर्चेच्यावेळी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी सनातन धर्माच्या संदर्भात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. सनातन धर्माच्या विषयाच्या मुद्द्यात कॉंग्रेसने पडू नये, अशी सूचना दिग्विजयसिंह आणि भुपेश बघेल यांनी केली.
कॉंग्रेस ही केवळ एक संघटना नाही, तर ती एक चळवळ आहे. याचे भान ठेवा अशी सुचनाही राहुल गांधी यांनी यावेळी केल्याचे पवन खेरा यांनी नमूद केले. कॉंग्रेस आणि भारतातील इतर पक्षांमध्ये हाच मूलभूत फरक आहे, असेही ते म्हणाले.