नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी “पीएम विश्वकर्मा’ योजनेचा शुभारंभ केला. दिल्लीतील द्वारका येथील “इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर’ (आयआयसीसी) येथे आयोजित कार्यक्रमात या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
ही योजना आशेचा नवा किरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी त्यांनी विविध कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रही दिली.
नरेंद्र मोदी म्हणाले, आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. हा दिवस आपल्या पारंपारिक कारागिरांना आणि शिल्पकारांना समर्पित आहे. मी सर्व देशवासियांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देतो.
भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने आजपासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना हाताची कौशल्य आणि साधने घेऊन काम करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी आशेचा नवा किरण म्हणून येत आहे.
द्वारका येथे बांधलेली “यशोभूमी’ देशाला समर्पित करताना ते म्हणाले की, आज देशाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र-यशोभूमीही मिळाली. येथे ज्या प्रकारचे कार्य केले गेले, त्यावरून माझ्या विश्वकर्मा बंधू-भगिनींची तपस्या आणि तपश्चर्या दिसून येते.
“यशोभूमी’मध्ये 11 हजार लोक एकत्र बसू शकतात. मुख्य हॉल आणि भव्य बॉलरूमसह ही 8 मजली इमारत 73 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत बांधली गेली आहे. त्यात 15 अधिवेशन कक्ष आणि 13 बैठक कक्षही करण्यात आले आहेत.
येथे केवळ बैठकाच आयोजित केल्या जाऊ शकत नाहीत तर परिषदा आणि प्रदर्शने देखील आयोजित केली जाऊ शकतात, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
कारागिरांची कलाकुसर जगभर पोहोचेल
मी त्या हजारो विश्वकर्मा मित्रांना सांगू इच्छितो की, हे एक खूप मोठे केंद्र असेल, जे तुम्ही प्रत्येक गावात घडवलेल्या कलाकृतीला जगासमोर नेण्याचे एक शक्तिशाली माध्यम ठरेल. हे तुमची कला, तुमची कौशल्य जगासमोर दाखवेल.
या माध्यमातून भारताच्या स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्घ होणार आहे. हजारो वर्षांपासून भारताच्या समृद्धीच्या मुळाशी असलेले मित्रच आपले विश्वकर्मा आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.
जसा पाठीचा कणा आपल्या शरीरात भूमिका बजावतो, त्याचप्रमाणे हे विश्वकर्मा साथीदार सामाजिक जीवनात भूमिका बजावतात, असेही त्यांनी म्हटले.
व्होकल फॉर लोकलचा अवलंब करा
“विश्वकर्मा दिनी’ आपण स्थानिकांसाठी आवाज उठवण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला पाहिजे. आता गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दिवाळीसह अनेक सण येत आहेत.
मी सर्व देशवासीयांना स्थानिक लोकांकडूनच “मेड इन इंडिया’ गोष्टी खरेदी करण्याचे आवाहन करू इच्छितो. व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून स्थानिक विक्रेत्यांकडून घर सजवण्याच्या वस्तूंपासून छोट्या वस्तूंपर्यंत सर्व आवश्यक गोष्टींची खरेदी करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.