पुणे – मान्सूनच्या आगमानाची चाहुल लागली असताना, दुसरीकडे राज्यातील विविध भागांत उष्णाचे चटके जाणवू लागले आहेत. सूर्य अधिक तळपू लागल्याने विदर्भात उष्णतेचा “रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान नागपूर येथे- 46.5, तर पुण्यातही तापमानाचा पारा 40.1 अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे.
कमाल तापमान 45 अंशापेक्षा अधिक असल्यास तसेच कमाल तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जाऊन तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशाची वाढ झाल्यास त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजण्यात येते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्माघाताची नोंद होऊ शकते. मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि तेलंगणातही जोरदार उष्णतेचे वातावरण राहील.
यंदाच्या मोसमातील ही सर्वाधिक उष्णतेची लाट असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे राज्यात अनेक भागात येत्या दोन दिवसांत विक्रमी कमाल तापमानाची नोंद होईल.