पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची युपीआय सेवा आणि पगारदारांसाठी अपघात विमा योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. बॅंकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन तसेच उत्तम आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल असे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार अशोक पवार, संजय जगताप, बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बॅंकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, यूपीआयसारख्या सुविधेचा वापर करून बॅंकेने आपण काळासोबत असल्याचे दाखवून दिले आहे.
या सेवेमुळे ग्राहकांना एका क्लिकवर विविध सुविधा मिळू शकतील आणि बॅंकेत होणारी गर्दी कमी होईल. बॅंकिंग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशावेळी व्यापारी आणि स्थानिक पतसंस्थांशी स्पर्धा करताना अनुकूल बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य ठेवावे. बॅंकेने ग्राहकहित समोर ठेवून वाटचाल करावी. मोबाइल बॅंकिंगमुळे या क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तंत्रज्ञान जाणणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही पवार यांनी केली.