पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाकडून घोषित केला आहे. या निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीला पुन्हा ब्रेक लागलेला आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी १५ जूनला मतदान होणार होते. शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत निवडणुक आयोगाने निवडणुक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता २६ जूनला निवडणुक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती.
समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील आचारसंहितेमधून शिक्षक भरतीसाठी शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहेत.
काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे.
शिक्षक भरतीतील समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरीत करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता झाल्यानंतर व विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही तातडीने सुरु करण्यात येणार आहे. ( – सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त )