पुणे – कल्याणीनगर अपघातप्रकरणी पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबीयांभोवती फास आवळला आहे. इतकेच नव्हे, तर पब चालकांनाही बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, घटनेच्या वेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या आमदार सुनील टिंगरे यांच्यासंदर्भात मौन बाळगले आहे. पोलीस ठाण्यात चालक बदलण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा टिंगरे तिथेच उपस्थित असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी केला होता.
पोलीस ठाण्यात टिंगरे उपस्थित असल्याचे आयुक्तांनीही मान्य केले आहे. त्यानंतर टिंगरे यांनी समाज माध्यमातून तेथे उपस्थित असल्याबद्दल त्यांची बाजू मांडली होती. मात्र, तपासाचा भाग म्हणून टिंगरे यांची चौकशी होणार का नाही, यावर मात्र सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले, की घटनेच्या दिवशी रात्रीच चालक बदलण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सदसदविवेक बुद्धीने किंवा फिर्यादींचा दबाव बघून तसे केले नाही. त्यांनी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलावरच गुन्हा दाखल केला. मुलावर गुन्हा दाखल झाल्यावरही पुढील काही तास चालक स्वत:वर गुन्हा दाखल करण्याची विनंती करीत होता. त्याला तसे पढवले गेले होते. यामुळे तो हा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेऊ इच्छित होता.
मात्र, पोलिसांनी त्याला दाद दिली नाही, तसेच बाल न्यायमंडळात देखील अग्रवाल कुटुंबाच्या वकिलांनी चालकच गाडी चालवत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात काही व्यवहार ठरला असेल, अशी अनेकांना शंका वाटत आहे. मात्र, गुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या मर्जीप्रमाणे दाखल झालेला नाही. गुन्हा त्यांच्या विरोधातच दाखल झाला आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अग्रवाल कुटुंबांकडून काहीही मिळणार नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे.
चौकशीची शक्यता वाढली
अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा देण्यात आल्याचे, तसेच आमदार टिंगरेंच्या उपस्थितीत नातेवाइकांवर दबाव टाकण्यात आल्याचे प्रकरण पोलिसांच्या अंगलट आले आहे. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीस ठाण्याचा डिव्हिआरही ताब्यात घेण्यात आला आहे,
तर दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टिंगरे त्यांच्या पक्षाचे आमदार असल्यामुळे टीका होत होती. या टीकेलाही पालकमंत्री पवार यांनी उत्तर दिले असून, अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नकोच, असे स्पष्ट केले आहे. यातच गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्याने टिंगरेकडे चौकशी होण्याची शक्यता वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘मी दिल्लीत होतो’
सुरेंद्र अग्रवाल याला शनिवारी दुपारी (ता. २५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी न्यायालयाने त्याला पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का, असे विचारले होते. त्यावर त्याने न्यायालयास सांगितले, की अपघात घडला, तेव्हा मी पत्नीसोबत दिल्लीत होतो. त्यामुळे या सर्व प्रकाराची मला काही माहिती नसून त्यात माझा सहभाग नव्हता.