पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरावरून यावर्षी प्रथमच एकच स्वतंत्र सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया होत आहे. मात्र, बारावी निकाल लागल्यानंतर बहुतांश पालक व विद्यार्थी बीबीए, बीसीए प्रवेशासाठी महाविद्यालयांशी संपर्क करत आहेत. मात्र, महाविद्यालयांना थेट प्रवेश देता येत नसल्याने यंदा बीबीए, बीसीए प्रवेशावरून विद्यार्थी व संस्थाही हतबल ठरल्या आहेत.
यंदापासून राज्य सीईटी सेलद्वारे बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होत आहे. दरवर्षी बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालय अथवा संस्थास्तरावर गुणवत्तेनुसार दिले जात होते. मात्र, ही पद्धत यंदापासून बदलल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे, तसेच जागा उपलब्ध असूनही प्रवेश देता नसल्याची खंत विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षीपासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम स्वत:च्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी मान्यता बंधनकारक केली आहे, तसेच या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जाही मिळाला आहे. त्यामुळे हे प्रवेश आता सीईटी सेलतर्फे होणार आहेत.
प्रवेशाविषयी विद्यार्थी अनभिज्ञ
बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वाधिक पसंती असते. त्यासाठी महाविद्यालयात चौकशी केल्यानंतर यंदापासून प्रवेशप्रक्रिया बदलल्याची माहिती मिळते. सीईटी दिल्याशिवाय कुठेही प्रवेश घेता नाही, ही वस्तुस्थिती आहे. या सीईटीबाबत फारशी जागृती अथवा माहितीच विद्यार्थी व पालकांना माहिती नाही.
सीईटी आजपासून
बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर एकूण ५६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केले आहेत. ही परीक्षा सोमवारी २७ ते २९ मे या कालावधीत होणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.