नगर – महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, सरकारने मुक्त परवाना धोरण बंद करून नवीन परवाने देणे तात्काळ बंद करावे, 15 वर्ष झालेल्या जुन्या रिक्षा, टॅक्सी तात्काळ स्क्रॅप कराव्यात, विना परवाना जुन्या ऑटो रिक्षांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करावी या मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, प्रमुख सल्लागार कॉ. बाबा आरगडे, कामगार नेते नितीन पवार, सरचिटणीस अशोक आंशिकर, सहचिटणीस लतीफ शेख, कार्याध्यक्ष विलास कराळे , खजिनदार गणेश आटोळे, संघटक नासिर खान, सुधाकर साळवी आदींच्या सह्या आहेत. तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने कामगार आयुक्तांच्या पुढाकारातून समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल शासनाने स्वीकारला पण पुढे काही कार्यवाही झाली नाही.
शासनाकडे पाठपुरावा करणार : आ. जगताप
रिक्षा चालकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चास जाहीर पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे, ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.