पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागावरील प्रवेशासाठी राज्यात पुणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३५ हजार २५२ अॉनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यात पालकांमध्ये आपल्या बालकांच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा लागणार आहे.
आरटीई अंतर्गत विना अनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो. संबंधित बालकांच्या शुल्काची प्रतिपुर्ती राज्य शासनाकडून शाळांना करण्यात येते. राज्य शासनाने जून्याच पध्दतीने आरटीई प्रवेशासाठी नियमावली लागू केली आहे. यामुळे आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आरटीई प्रवेशासाठी राज्यातून ९ हजार १९७ शाळांनी नोंदणी केली असून १ लाख ४ हजार ७३८ प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी तब्बल १ लाख ६९ हजार २०४ अर्ज दाखल झालेले आहेत. पुणे जिल्ह्यात ९६६ शाळांमध्ये १७ हजार ५९६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत.
प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत दुप्पटीने अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या मुदतीत आणखी अर्ज नोंदणी होणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी जिल्हानिहाय दाखल झालेले प्रवेश अर्ज
अहमदनगर – ४९९८, अकोला – ३४२४, अमरावती – ४८९२, छत्रपती संभाजीनगर – १०२६८, भंडारा – १४६०, बीड – ३७६१, बुलढाणा – ३४९९, चंद्रपुर – २१९०, धुळे – १८६६, गडचिरोली – ५४१, गोंदिया – २१४७, हिंगोली – १११७, जळगाव – ५३५८, जालना – ३३७५, कोल्हापुर – २३५६, लातुर-३५९५, मुंबई – ६४१३, नागपुर- १५५७२,
नांदेड – ५८००, नंदुरबार-५२८, नाशिक – १०१८०, उस्मानाबाद – १५८७, पालघर – २७४१, परभणी – २०५३, पुणे – ३५२५२, रायगड – ५३९३, रत्नागिरी-५४४, सांगली – १५१५, सातारा – २४४३, सिंधुदुर्ग – ८१, सोलापुर – ३३९७, ठाणे – १३८८९, वर्धा – २१७९, वाशिम – १३४९, यवतमाळ – ३४४१.