Eknath Shinde And Ajit Pawar| पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरामध्ये संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे. तसेच अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंनी प्रयत्न केल्याचेही यात राऊतांनी म्हंटले आहे. याशिवाय यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अमित शाह घरी पाठवतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
‘एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केला’
संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला. “दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट.”
“अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, ” असा गंभीर दावा संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, “गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.”
‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’
यात योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल देखील मोठा दावा करण्यात आला आहे. “जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल.” Eknath Shinde And Ajit Pawar|
हेही वाचा:
दिल्लीतील बेबी केअर सेंटला भीषण आग; 6 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू