पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हवामानातील बदलामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी घटली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत दोन्ही फळांच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली आहे, तर चिकू आणि लिंबूच्या भावात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (दि. २६) मोसंबी ३० ते ४० टन, अननस ६ ट्रक, संत्री ४ ते ५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते एक हजार दोनशे गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिकू पाचशे बॉक्स इतकी आवक झाली होती.
गावरान आंब्यांची १२० टन आवक
कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तिकडे वादळ आणि पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. परिणामी आवक कमी- जास्त होत आहे. मात्र, १० जूनपर्यंत आवक सुरू राहणार आहे. कोकणातील हापूसची आवक घटल्यामुळे कर्नाटक आणि गावरान आंब्याची बाजारात चलती आहे.
कर्नाटक येथून रविवारी (दि. २६) येथील बाजारात ४ ते ५ हजार पेटी आंब्याची आवक झाली. कर्नाटक हापूसच्या ४ ते ५ कच्चा मालाच्या डझनाच्या पेटीला १००० ते चौदाशे रुपये भाव मिळाला, तर कोकणातून अवघी दोनशे ते तीनशे पेटी इतकी आंब्यांची आवक झाली. ४ ते ७ डझनाच्या पेटीला १५०० ते २५०० रुपये भाव मिळाला.
सध्या गावरान आंब्याची आवक खूप वाढली आहे. तब्बल १२० टनची आवक रविवारी (दि. २६) मार्केट यार्डात झाली. घाऊक बाजारात कच्च्या हापूसला किलोला ४० ते ८० रुपये, पायरीला २० ते ५० रुपये आणि केशरला ३० ते ८० रुपये भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.