निवडणुकीच्या धामधुमीत झळा सोसवेना : पशूधन जगविण्याची चिंता
संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती – शिरुर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात सत्ताधारी व विरोधी पक्षांना पाणीटंचाईचा विसर पडला आहे. शिरुर तालुक्यात औद्योगीकरणामुळे पुणे – नगर महामार्गालगतच्या गावांमध्ये वाढलेल नागरिकीकरण हे भविष्यात तालुक्यातील शेतीचे पाणी पळवणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना दिसून येत नाही. शिरुरच्या बागायती व दुष्काळी पट्ट्यात पिके व जनावरे जगवण्यासाठी शेतक-यांना मोठी कसरत करावी लागत आहे. माञ शिरुर शहराबरोबरच महामार्गालगतच्या सर्वच ग्रामपंचायतींच्या हद्दीत ऐन उन्हाळ्यात व भीषण पाणीटंचाई सुद्धा मोठ मोठ्या इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ग्रामपंचायतींच्या संबंधित अधिकारी व पदाधिका-यांच्याच आशिर्वादाने होत असल्यामुळे व धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिरुरकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.
शिरुर तालुक्याच्या शिवारात चासकमान व डिंभा कालव्याचे पाणी फिरत आहे. याच पाण्यावर तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. मात्र, पुणे – नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा , सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, सरदवाडी ते शिरुर या पट्ट्यात औद्योगीकरणासह नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वैध व अवैध्यरित्या झालेल्या गुंठेवारीत जागा घेऊन घरी व इमारती बांधल्या जात आहेत. ग्रामपंचायतीं ही इमारतींना सुविधा उपलब्ध करुन देत आहे. त्याच बरोबर बांधकामधारक ही कुपनलिका घेत असल्यामुळे तालुक्यातील जमिनीची चाळण झाली आहे. परिमाणी पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.
ऐन उन्हाळ्यात शिरुरकरांना पाण्यासाठी चासकमान व डिंभा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिमाणी या पाण्यावरुन कधी-कधी टेल टु हेड व हेड टु टेल असा वाद निर्माण होत आहे. दोन वर्षापासून शिरुर तालुक्यात लहान-मोठ्या गावांमध्ये शेकडो कोटींच्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. मात्र, ” अडातच नाही तर पोहो-यात कुठुन येणार ” याप्रमाणे पाणीपुरवठा योजना पाणवठ्यांवर अवलंबून आहेत. ते पाणवठेच उन्हाळ्यात कोरडे ठाक पडतात. योजनांचा पाणी कसे उपलब्ध होणार हा प्रश्न उभा राहिला आहे. शिरुर तालुक्यात भविष्यात शेतीला कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे शिरुरकरांना भविष्यात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शिरुर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील १२ गावे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी शासनदरबारी संघर्ष करीत टाहो फोडत आहेत. मात्र, त्यांच्या संघर्षाला अद्यापही यश आलेले नाही.