उदयनराजेंशी वैचारिक वाद नाही
सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांना भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसल्याने भाजपने छत्रपतींच्या गादीचा किती सन्मान ठेवला असा प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे छत्रपतींच्या गादीचा सन्मान करायचा नाही आणि दुसरीकडे छत्रपतींच्या गादीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायची अशी दुटप्पी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला. खा. श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य कोणाशीही आपला वैचारिक वाद नसल्याचेही आ. शिंदे यांनी सांगितले.
लाेकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघात प्रचार यंत्रणा गतीमान केली आहे. यादरम्यान सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शिंदे म्हणाले, आ. जयकुमार गोरे आता छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवून सातारा लाेकसभेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करत आहेत. मुळात भाजपने छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवला आहे का, छत्रपतींच्या गादीवर प्रेम, निष्ठा असती तर उदयनराजेंची उमेदवारी केव्हाच जाहीर झाली असती, असा टोला आ. शिंदे यांनी लगावला.
मी छत्रपतींच्या गादीचा नेहमीच आदर करत असून गादीवर मी बोलणार नाही. त्यांना अद्याप उमेदवारी देणे हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. उदयनराजेंसह आपले कोणाशीही राजकीय वैर नसून आपली लढाई स्वाभिमानाची असल्याचे आ. शिंदे यांनी नमूद केले.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यातील जनतेला आदर असून त्यांना ज्या प्रकारे त्रास देण्याचे प्रयत्न झाले आहेत त्याची जनतेत प्रचंड चीड आहे.
लाेकसभा निवडणुकीत भाजप चारशे पारचा नारा देत असले तरी ती त्यांची घोषणा हवेतच राहणार आहे. सातारा मतदारसंघात प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मी तळागाळातील लाेकांमध्ये काम करणारा माणूस आहे. त्यामुळे सर्वांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न राहिला आहे. लाेकशाही टिकवण्यासाठी आणि सातारा जिल्ह्याला वेगळे व्हिजन देण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असून जिल्ह्यातील जनता आपल्याला साथ देईल, असा विश्वास आ. शिंदे व्यक्त केला.