वाल्हे – पुरंदरचे प्रसिद्ध असलेले अंजीर या वर्षी तिव्र पाणीटंचाई, कडाक्याची थंडी, धुके, तसेच ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या हलक्या सरी यामुळे संकटात सापडले आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने बागेतील झाडावर अजींराला चिरा पडू लागल्या होत्या. तसेच काही अंजीरांना बुरशी आल्याने व काही अंजीराच्या झाडांची मोठी पानगळ झाली होती. आगोदरच संकटात असलेल्या अंजीर उत्पादक शेतकर्यांवर आता अवकाळीच्या सरीचे संकट ओढावले आहे.
यामुळे अंजीर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच अंजीर बागेला केलेला खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सद्यःस्थितीत असलेल्या ढगाळ हवामानाचा तसेच वाढत्या थंडीचा व अवकाळी सरीचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. वातावरणातील बदलामुळे अंजीर पिकांवर करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे.
लहरी अंजीर जागेवर उकलू लागल्यामुळे उत्पादक शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत. ढगाळ हवामानामुळे अंजीर फळे हे उकलत असून गोडी देखील कमी होत आहे. अशा ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन निघत आहे. परिणामी अंजीर उकलले गेल्याने बाजारभावात देखील कमालीची घसरण झाली आहे.
यंदा पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस, मान्सून पाऊस, तसेच परतीचा पावसाने दडी मारल्याने, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच थंडी, ढगाळलेले वातावरण अंजीर बागांना हानिकारक ठरत असून, हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण वाढत असल्याने फळे उकलू लागली आहेत. थंडीमुळे फळाचे आकारमान व कलर येत नसल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर होते आहे.
बाजारभावही ढासळू लागले
अंजीर फळांचे बाजारभाव मागील आठवड्यापासून ढासळू लागले असून 14 किलो अंजीराची उपणी फक्त 500 रुपयाला विकली जात असल्याने शेतकर्यांने अंजीर बागेसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्रसमोर दिसत असल्याने अंजीर उत्पादक शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.
उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या
अंजिराच्या उत्पन्नामध्ये जवळपास 50 ते 60 टक्क्यांंपेक्षा अधिक घट होत असून अंजीर उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बागांवर झालेला खर्चदेखील निघेनासा झाल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडून शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजीर उत्पादक संभाजी पवार, प्रशांत पवार , महेश पवार यांनी सांगितले.
विम्यासाठी प्रयत्न करा
वाल्हे परिसरातील आडाचीवाडी, सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे अंजीराचे बागांचे प्रमाण जवळपास 16. 61 हेक्टर क्षेत्रामध्ये अंजीर फळबागा आहेत. तसेच पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अंजीर उत्पादन घेतली जाते. मात्र, इतर पिकांना, तसेच इतर फळांना विमा मिळाला जातो. इतर फळांच्या तुलनेत अंजीर या फळाला विमा मिळत नसल्यामुळे तो विमा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत; अशी मागणी प्रगतशील बागायतदार, वाल्हे गावचे माजी उपसरपंच सूर्यकांत पवार यांनी शेतकर्यांच्या वतीने केली आहे.