पुणे – खंडणी, फसवणूक, दंगा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोंढवा परिसरातील सराईत गुन्हेगार महिलेवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
रेश्मा बापू भालशंकर (४५, आंबेडकर वस्ती, येवलेवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलिसांत भालशंकर या महिलेवर गरीब व गरजू लोकांकडे खंडणी मागणे, फसणवूक, शिवीगाळ यांसारखे गुन्हे दाखल आहेत. तीच्या या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झालेली होती. सरकारी दस्तऐवजाशिवाय सरकारी जमीन लोकांना विक्री करून स्वतःचा अर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने लोकांची फसवणूक ़करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याचेही समोर आले आहे.
तिच्यावर मागील तीन वर्षांमध्ये ४ गुन्हे दाखल आहेत. या पाश्र्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी एमपीडीए कायद्यान्वये महिलेस स्थानबद्ध करणेकामी प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. याची पडताळणी करून आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याला मंजूरी दिली.