कोलकाता – केंद्र सरकार तृणमूल कॉंग्रेसशी राजकीय दृष्ट्या लढू शकत नसल्याने त्यांच्या ताब्यातील तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला.
बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी तसेच त्यांच्या पत्नी रुजीरा यांना कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले. कालीघाट येथे तृणमूल विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला ममता मार्गदर्शन करत होत्या.
ममता म्हणाल्या, आमचे प्राधान्य लोकांसाठी काम करणे आहे.
जेव्हा दिल्लीतील भाजपा सरकार राजकारणात आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा ते तपास यंत्रणांचा वापर करतात. काही लोक आम्हाला सोडून गेले होते पण आता ते परत आले आहेत कारण त्यांना माहित आहे की हा पक्ष हेच त्यांचे घर येथे आहे.
भाजपचे मंत्री कोळसा माफियांच्या हाताशी आहेत. मी माझ्या राजकीय जीवनात असा सूडबुद्धीने चालणारा पक्ष आणि सरकार कधीच पाहिलं नाही. तुम्ही आम्हाला ईडीचा धाक दाखवल्यास, आम्ही भाजपा नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावेही पाठवू. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि इतर सर्व आयोग राजकीय झाले आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य भाजपचे आहेत, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला आहे.
मतदानोत्तर हिंसाचारात 5 भाजप कार्यकर्ते आणि 16 टीएमसी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. आम्हाला सीबीआयची काहीच अडचण नाही, पण ते भाजप नेत्यांना त्यांच्यासोबत खेड्यापाड्यात का घेऊन जात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.