पुणे – काव्य हे निसर्ग आणि मानव यांच्या एकमेकातल्या गूढ संवादाला मिळालेलं शब्दरुप आहे असं मानणाऱ्या राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांच्या ८३ वा स्मृतीनिमित्ताने सृजन स्नेही, पुणे निर्मित सुधीर मोघे प्रस्तुत ‘स्मरण राजकवींचे’ या तांबे यांच्या काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले.
राजकवींचे स्मरण करताना त्यांची सर्व लोकप्रिय गाणी, त्यांच्या महत्त्वाच्या कविता, त्यांच्या काव्य-गीतांवर समीक्षकांनी लिहीलेल्या टीपा, काही पत्रव्यवहार आणि काही आठवणींचा अंतर्भाव सादरीकरणात करण्यात आला होता.कार्यक्रमात गेली ज्योती विझोनिया, कुणि कोडे माझे उकलिल का, मग विसर हवा तर हा क्षण गे, घट भरे प्रवाही बुडबुडुनी, बघुनि तया मज होय कसेसे, भयचकित नमावे तुज रमणी, रुद्रास आवाहन, महाप्रस्थान, सहज तुझी हालचाल, तृणाचे पाते आणि पूर्णाहुती या कविता, सुधीर मोघे तसेच मीनल रानडे यांनी सादर केले.
तर मीनल गानू यांनी डोळे हे जुल्मि गडे, तीनी सांजा सखे मिळाल्या, तुझ्या गळा माझ्या गळा, ते दूध तुझ्या त्या घटातले, नववधू प्रिया मी बावरते, घन तमी शुक्र बघ, जन पळभर, कशी काळनागिणी, निजल्या तान्ह्यावरी, कळा ज्या लागल्या, मधु मागसी, मावळत्या दिनकर ही लोकप्रिय गाणी सादर केली. एकूणच संपूर्ण सादरीकरणाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जेष्ठ पत्रकार, लेखक भगवान दातार, पुणे विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. राजू पाटोदकर, कवि आणि नाटककार डॉ. विजय देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन राजकविंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
भा. रा. तांबे यांचे नातू शिरीष तांबे यांनी या वेळी मान्यवरांचे सपुष्प स्वागत केले.
कार्यक्रमानंतर बोलताना भगवान दातार म्हणाले की तांब्यांसारखे कवी हे युगायुगातून केव्हातरी एकदाच निर्माण होतात.तर रेखाताई कोतवाल यांनी भा. रा. तांबे यांच्या संपूर्ण जीवनात चिद्-विलास जाणवतो हे सोदाहरण सांगितले. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमास तांबे कुटुंबियांपैकी त्यांची नात नंदाताई सत्वे, नातजावई श्री सत्वे, चुलत नातू प्रकाश तांबे, सौ. छाया तांबे आणि तांबे कुटुंबियांचे स्नेही आणि शासनाच्या विज्ञान औद्योगिक प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार असलेले बी. एच. श्रीकांत आदि मान्यवर उपस्थित होते. समारोप करताना सृजन स्नेहीचे सुधीर मोघे यांनी सर्व मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले.