कोथरूड (सागर येवले)- आगामी महापालिका निवडणुकीतील प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोथरूडची प्रभाग रचना पाहता येथील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व बदलणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे विद्यमानांसह इच्छुकही पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे.
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन प्रभाग येतात, त्यामध्ये 12 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे, दोन कॉंग्रेसचे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. मात्र, आता तीन सदस्यीय रचनेमुळे प्रभागाची संख्या चार झाली आहे. त्यातील एक प्रभाग सोडला तर अन्य तीन प्रभाग हे महाविकास आघाडीच्या फायद्याचे आहेत, त्यामुळे कोथरूडच्या बालेकिल्लयांवर आघाडीचे वर्चस्व राहणार की भाजपचे, हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोणत्या पक्षाकडून कोण उतरणार, हे समजल्यावर चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे उमेदवार देतानाही पक्षाला “तो माझा कार्यकर्ता’, यापेक्षा माझा पक्ष, जनसंपर्क आणि विरोधकांसमोर आव्हान निर्माण करणारा उमेदवार द्यावा लागणार आहे.
प्रभाग क्र. 30 मध्ये (पूर्वीचा प्रभाग 11) वस्ती भागाचा परिसर मोठ्या प्रमाणात असून याठिकाणी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे याहीवर्षी या प्रभागात आघाडीचे वर्चस्व राहू शकते. प्रभाग क्र. 31 (पूर्वीचा 12) याठिकाणी शिवसेना आणि भाजपला मानणारा वर्ग अधिक आहे. पूर्वी कोथरूड म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, अशी ओळख होती, त्यावेळी युतीची साथ होती. मात्र, या परिसरातील नेत्यांमध्ये असलेले मतदभेद, कुरघोड्यांमध्ये सर्वसामान्य शिवसैनिक दुरावला. परंतु, यंदा हा बालेकिल्ला पुन्हा मिळविण्याची संधी आहे. प्रभाग क्र. 32 (पूर्वीचा 10) या प्रभागामध्ये सध्या भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, यंदाच्या प्रभागरचनेत तोडफोड झाली हा प्रभाग आघाडीसाठी फायद्याचा ठरू शकतो. प्रभाग 33 नव्याने वाढलेला, यामध्ये बावधन खुर्दचा भाग आणि महापौर यांचा कोथरूडमधील तोडलेला अर्धा भाग, असा मिळून प्रभाग तयार करण्यात आला आहे. मात्र, हा प्रभाग भाजपसाठी अनुकुल असल्याचे दिसते. आघाडीला प्रभागामध्ये बाजी मारायची असेल तर तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.
अनेक जण “स्वगृही’ परतणार?
2017च्या निवडणुकीत पक्ष बदलून भाजपमध्ये आलेले उमेदवार आता बदलेल्या प्रभाग रचनेमुळे पुन्हा स्वगृही जाण्याच्या तयारीत आहेत. कारण, या प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवाराबरोबरच पक्षाचे ठरलेले मतदान आहे. त्यामुळे आघाडी सरकारमधील पक्षाचा हे प्रभाग फायद्याचे असल्यामुळे भाजपमधील काही उमेदवार स्वगृही जाण्यासाठी चाचपणी करीत आहेत. तर, अन्य पक्षातील इच्छुकही पक्ष बदलाच्या तयारीत आहेत.