नगर -जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर पुरवठा विभागाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारवाईचा निषेधार्थ जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथे भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणी सखोल चौकशी करुन, दुकानदारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मत्री भुजबळ यांनी त्वरीत चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याचे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी दिली.
नगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर गेल्या तीन महिन्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये कोणत्याही लाभार्थ्यांची तक्रार नसताना कारवाई करुन त्यांच्यावर पुरवठा विभागाने गुन्हे दाखल करून स्वस्त धान्य दुकाने सील करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या मंजुर नियतनापैकी गोदामातून प्रत्येक गोणी मध्ये 2 ते 3 किलो धान्य कमी येते. किरकोळ 2 ते 3 किलो धान्य साठा कमी आढळ्याचे कारण पुढे करुन कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत मागासवर्गीय दुकानदारांना टार्गेट करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ज्या व्यक्तीचा स्वस्त धान्य दुकानांशी कोणताही संबंध नसतांना त्यांच्या नांवे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन स्वस्त धान्य दुकानदारांना न्याय मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मिनाक्षी कळकुंभे, मनिषा साळवे, प्रकाश होणाजी, ओमप्रकाश कवडे, रंजना सुतार, सिंधूबाई अल्हाट, लक्ष्मण धूत, प्रवीण नाईक, डी.बी. बिहाणी उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानदारांवर झालेली कारवाई चुकीची असून, लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या दुकानदारांना त्रास देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांवर पूर्ण चौकशी करुन दुकानदारांना देखील त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. झालेल्या या चुकीच्या कारवाईत स्वस्त धान्य दुकानदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
आनंद लहामगे
शिवसेना उप जिल्हाप्रमुख