नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील निसर्ग चक्री वादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा (दि.5) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रांतधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार हनमंत कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, सभापती संजय काळे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, अंकुश आमले आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
दौऱ्यात सावरगाव, येणेंरे, पारुंडे, बेलसर, ढगडवाडी भागाचा दौरा करून पवार यांनी नुकसान झालेल्या आंबा, केळी, पपई, ऊस, बाजरी, टोमॅटो, डाळिंब, कांदा, भाजीपाला आदी पिकाच्या नुकसानीबाबत माहिती घेतली. सावरगाव येथील शरद महाबरे, येणेरे येथील म्हातारबा ढोले व ठाकरवाडी येथील बाळू भालेकर यांच्या पडलेल्या घरकुलाची पाहणी केली.
विठ्ठलवाडी व ढगदवाडीत वादळाने पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. जुन्नर येथे चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्या अजय साळुंखे यांच्या कुटुंबीयांना भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जुन्नर तालुक्यात पावसाने 5 हजार 735 हेक्टर क्षेत्रातील 22 हजार 960 शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुमारे 40 कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली.