कराड – राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली. काहीही करुन पृथ्वीराज चव्हाण यांना अडवायचे, यासाठी भाजपचे अतुल भोसले यांनी मोठी व्यूहरचना आखली होती. यामध्ये ते अपयशी झाले, हे निकालातून समोर आले आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना 91 हजार 790 एवढी मते मिळाली. तर 82 हजार 277 मते मिळवून डॉ. अतुल भोसले दुसऱ्या क्रमांकावर राहिले. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांना 29 हजार 99 मते मिळाली. चुरशीच्या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी नऊ हजार 513 मते मिळवत बाजी मारली.
भाजपचे मनसुबे हवेतच
विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांनी कपबशी या चिन्हावरुन निवडणूक लढवत बंडखोरी केली होती. त्यांना 29 हजार 99 मते मिळाली. पृथ्वीराज चव्हाण यांना काहीही करुन कराड दक्षिणमध्ये चितपट करायचे, यासाठी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ना. चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापासून आखणी केली होती. मात्र, मुख्यमिंत्रपदाच्या कार्यकाळात कोणताही गट तट न बघता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्येक गावाला निधी दिला. त्यामुळेच जनतेने त्यांना पुन्हा आमदार केले. भाजपने शहरातील 22 नगरसेवकांना आपल्याकडे घेत दक्षिणेतील बऱ्याच आयारामांना भाजप घेऊन मोठी मेगाभरती केली होती. कराड दक्षिणमधील नेते डॉ. अतुल भोसलेंच्या मागे ही ताकद उभी राहिली. मात्र मतदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याच पाठीशी होता, हे निकालानंतर सिद्ध झाले आहे.
साताऱ्यातील वखार महामंडळामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. अंबवडे, विंग, कोळे येथून मतमोजणीस प्रारंभ झाला. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्या फेरीतच एक हजार 617 मतांची आघाडी घेत विजयी मनसुबे दाखवून दिले. त्यानंतर पुढील नऊ फेऱ्यातही पृथ्वीराज चव्हाण यांनी कमी-जास्त प्रमाणात आपले मताधिक्य कायम ठेवले. दहाव्या फेरीत गोवारे, सैदापूरमध्येही पृथ्वीराज चव्हाण यांनी सहा हजाराचे मताधिक्य घेतले. याच फेरीमध्ये कराडमधील एका बूथवर 1200 हून अधिक मताधिक्य मिळाले. 11 ते 16 या पाच फेऱ्यांमध्ये कराड शहरातील मतमोजणी झाली. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी आठ हजारांवर मते मिळवत निर्णयक आघाडी घेतली. आणि त्यांना तब्बल सोळा हजाराचे मताधिक्य मिळाले.
शहरातील मतमोजणी झाल्यानंतर मलकापूर शहरासह कापिल, गोळेश्वर, जखिनवाडी, काले या ठिकाणच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. नुकत्याच झालेल्या मलकापूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत येथे भाजपने मोठ्या प्रमाणात मते मिळवल्याने याठिकाणी भाजप चांगली मते घेईल असा अंदाज होता. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागासह जोरदार मुसंडी मारत वीस हजारांच्यावर मताधिक्य मिळवले. त्यानंतर आटके, नारायणवाडी, वाठार, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, शेणोली, वडगाव, शेरे, दुशेरे हा भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचा बालेकिल्ला असल्यामुळे या भागात पृथ्वीराज चव्हाण यांचे 20 हजाराचे मताधिक्य कमी झाले. येथे अतुल भोसले यांनी दहा हजारांवर मते घेतली. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे मताधिक्य दहा हजाराच्या आत आले. शेवटी त्यांचा नऊ हजार 513 मतांनी विजय झाला.