मुंबई : राज्यात सध्या भोंग्यांच्या विषयावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असताना भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
प्रीतम मुंडे या आज बीडमध्ये प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी,“धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही, पण ज्या गोष्टी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय नेत्यांना या विषयाला सामोरे जावं लागणार आहे,” असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, करोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे प्रीतम मुंडे यांनी कौतुक केले. “कोविड काळात सरकारने चांगलं काम केलं आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये करोनाचा सामना करत असताना केंद्र सरकार ज्याप्रकारे सजग आणि सतर्क होतं तसंच काळजी घेत होतं त्याप्रमाणे राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले,” असे कौतुकदेखील मुंडे यांनी केले आहे.