नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे “असत्याचे जगतगुरू’ आहेत, अशी जळजळीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मणिपूरच्या निवडणूकीसाठीचे कॉंग्रेसचे निरीक्षक जयराम रमेश यांनी केली आहे. “ऍफ्स्पा’, “एमएसपी’ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींसारख्या मणिपूरशी संबंधित मूलभूत मुद्यांबात पंतप्रधान गप्प का आहेत, असा प्रश्नही रमेश यांनी विचारला आहे.
इंफाळमधील निवडणूक प्रचार सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यांवरही रमेश यांनी जोरदार टीका केली आहे. “भाजपच्या डबल इंजिनच्या सरकारमुळे मणिपूरच्या आगामी 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला गेला आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यावर मणिपूरमध्ये देशातील सर्वात कमी लसीकरण झालेले असताना सर्वाधिक लसीकरणाचा मोदींनी केलेला दावा पाहता पंतप्रधानांसाठी “असत्याचे जगतगुरू’ हीच उपाधी अधिक योग्य असल्याची टीकाही रमेश यांनी केली.
मणिपूरमध्ये केवळ 47.6 टक्के जनतेला करोनाविरोधी लसीकरण झाले आहे, अशी माहितीही रमेश यांनी दिली.
प्रशासन लोकांच्या दारी पोचवल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात स्वायत्त जिल्हा परिषदांच्या निवडणूका गेल्या पाच वर्षात घेतल्या गेलेल्या नाहीत.
ही लोकशाहीची हत्या आहे. कॉंग्रेसच्या काळात उर्जा क्षेत्रात खराब काम झाल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. मात्र 2015-16 मध्ये उर्जा क्षेत्रातील कामासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मणिपूरला मिळाला होता, असे रमेश म्हणाले. कॉंग्रेसच्याच काळात 2017 पर्यंत रेल्वेचे 70 टक्के प्रकल्प पूर्ण झाले होते. असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.