मुंबई – अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजन समारंभाला शिवसेनेचे तिन्ही आमदार गैरहजर राहीले. त्यामुळे जिल्ह्यात महाआघाडीतील विसंवाद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तीन आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार आणि आदिती तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तटकरे यांना हटवा, अशी माणगी केली आहे. कोणीही द्या, पण रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागणीची अद्याप फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आमदारांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि पालकमंत्र्याबाबत आपली नाराजी पुन्हा एकदा या माध्यमातून व्यक्त केली.
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना आमदारांच्या गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही कार्यक्रमाला अनुपस्थित राहीले. शिवसेनेचे पदाधिकारीही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.