नागपूर – एसटी कामगारांनी त्यांच्या प्रश्नावर लढा दिला, भाजपने त्यांची साथ सोडली. आज त्यांच्या परिवाराची वाईट अवस्था आहे, यावर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. देशात परिवर्तन हवं असेल तर कॉंग्रेस हा मूळ पक्ष आहे, त्यामुळे आम्ही कॉंग्रेस सोबत आहोत, असे चंद्रशेखर राव यांनी सांगितले. काल त्यांची भेट होऊ शकली नाही, मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपने नागपूरकरांना आर्थिक बोजाखाली टाकले हे लोकांच्या लक्षात आले, त्यामुळे भाजपमधील लोक आता कॉंग्रेसमध्ये परत येत आहेत. नागपूरच्या पालकमंत्री यांच्या विरोधात जे काही आरोप लावले गेले त्या संबंधाची माहिती नाही, त्यामुळे आरोपावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही, असे नाना पटोले म्हणाले.
आरोप कुणी लावला यात अर्थ नाही, आरोपात किती तथ्य आहेत हे महत्त्वाचे आहे, या आरोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, हे थांबविले पाहिजे. सुशांतसिंग प्रकरणात तेच केले, त्यात निघाले काय, बिहारच्या निवडणुका लढायचे होते, हे स्पष्ट झाले आहे. तसेच अर्वाच्य भाषेत राजकारण्यांनी बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, मी गावगुंडांबद्दल बोललो, त्यावेळी ते काय बोलले हे सर्वांना माहीत आहे. कुणीही कुणाचा राजीनामा मागू शकतो, परवा मला एका भिकाऱ्याने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला.