अकोले -केंद्र सरकारच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील जनतेला प्रधानमंत्री कल्याण योजनेतून मोफत तांदूळ, उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस सिलिंडर, महिलांसाठी प्रधानमंत्री कल्याण योजनेतून जनधन खात्यावर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 500 रुपये, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेतून दोन हजार रुपये बॅंक खात्यात जमा झाल्यामुळे जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलासा दिला आहे, असे मत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले.
पिचड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अकोले तालुक्यात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे 12 हजार 347 लाभार्थी असून, त्यांच्या खात्यात प्रतेकी 735 प्रमाणे 90 लाख 75 हजार 45 रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली. तसेच तालुक्यातील 21 हजार 693 कुटुंबांना पाच किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात आले आहे. तीन हजार 638 महिलांच्या बॅंक खात्यात पंतप्रधान कल्याण योजनेतून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 18 लाख 19 हजार रुपये, तर पंतप्रधान आवास योजनेतून दोन हजार 200 घरकुले मंजूर करण्यात आले. लाभार्थ्यांच्या खात्यात केंद्र सरकाने प्रत्येकी एक लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतून अभयारण्य गावामध्ये एक हजार गॅस देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळ, बॅंक अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, महसूल विभाग याबाबत त्याचा पाठपुरावा करीत असून या योजनेतून वंचित लाभार्थीची माहिती स्थानिक स्तरावरून प्राप्त करून त्यांना लाभ कसा देत येईल ? यासाठी सर्व विभागाचे प्रयत्न दिसून येत आहेत. करोना संकटामध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी सूट दिली असून, केंद्र सरकाने मोठा निर्णय घेऊन गॅस सिलिंडरसाठी पुढील तीन महिन्यांपर्यंत एकही रुपया लाभार्थ्यांना द्यावा लागणार नाही. तसेच त्यासाठी दोन दिवसांपेक्षा जास्त प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नसून, अडवणूक झाल्यास कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
तसेच लॉकडाऊन असल्याने रेशन दुकानांमधून प्रत्येक व्यक्तीला एक महिन्यासाठी पाच किलो प्रमाणे तीन महिन्यांचे तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने दर महिन्याला हे वाटप होणार आहे. पंतप्रधान जनधन योजनेची रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाल्यामुळे गरीब, उपेक्षित व्यक्तींना त्याचा निश्चित लाभ होईल, असे ते म्हणाले. इतर योजनांचाही गरीब, वंचित, दलित, आदिवासी, शोषित महिला, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगारांना निश्चितपणे फायदा होणार असून, करोनाच्या संकटात या योजनांमुळे देशात स्थिरता येईल. आज देशात करोनासारख्या दुर्धर आजाराचे संकट आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी दिवस-रात्र काम करीत असून, जनतेनेही त्यांना साथ देऊन घरातच राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही माजी मंत्री पिचड यांनी केले आहे.