नगर -राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या व एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यात सवलतीच्या दराने अन्नधान्य दिले जाणार आहे.त्यानुसार केशरी रेशनकार्ड धारकांना प्रती व्यक्ती आठ रूपये दराने तीन किलो गहू व बारा रूपये दराने दोन किलो तांदूळ मिळणार आहे. “करोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केशरी रेशनकार्डधारकांना देण्यात येणाऱ्या या धान्य वाटपाचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
मे व जून महिन्याच्या धान्य वितरणाचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ज्या केशरी रेशन कार्डधारकांची नोंद ऑनलाइन झाली नसेल, त्यांनाही सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे.धान्य दिल्यानंतर त्यांच्या रेशनकार्डवर धान्य दिल्याची पोहोच म्हणून रेशनकार्डच्या शेवटच्या पानावर शिक्का मारण्यात येणार आहे.जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या नियोजनानुसार मे महिन्याचे धान्य तीन टप्प्यांत वाटले जाणार आहे.
त्यामध्ये 24 एप्रिल ते 10 मे याकाळात केशरी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात येईल. ते मे याकाळात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना नियमित धान्य देण्यात येईल. तर, 11 ते 20 मे याकाळात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. 21 मे ते 31 मे या काळात जे राहिलेले केशरी रेशन कार्डधारक, राहिलेले अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे धान्य देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना पावती देणे अनिवार्य
स्वस्त धान्य दुकाने दररोज सकाळी सात ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते रात्री त्या दिवसाचे धान्य वाटप संपेपर्यंत उघडी ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियमित व मोफत; तसेच केशरी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करताना लाभार्थ्याला पावती देणे स्वस्त धान्य दुकानदारांना अनिवार्य करण्यात आले आहे. दुकानामध्ये गर्दी न करता प्रत्येक ग्राहकामध्ये एक मीटर अंतर ठेवून तोंडाला मास्क लावून धान्याची उचल करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.