नगर, (प्रतिनिधी) – शंभर टक्के मतदान झाल्यास चांगला व सक्षम उमेदवार निवडून येण्यास मदत होणार आहे. पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान होणे हे लोकशाहीला घातक आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन लोकशाही सक्षम करण्याचा प्रत्येक भारतीयाने संकल्प करण्याचे, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी केले.
घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात सेवादारांनी मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. अन्न छत्रालयाबाहेर मतदार जागृतीसाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. या सेल्फी पॉइंटचे अनावरण लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांच्या हस्ते झाले.
यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, मुन्ना जग्गी, कैलास नवलानी, सोमनाथ चिंतामणी, प्रशांत मुनोत, राजू जग्गी, प्रमोद पंतम, जय रंगलानी, राहुल बजाज आदी उपस्थित होते.
अन्न छत्रालयात जेवणाचे पाकिट घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य कामगार वर्ग, रुग्णाचे नातेवाईक व गरजू घटकांना लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करुन, जसे पोटासाठी जेवण तसे देशासाठी मतदानचा संदेश देण्यात येत आहे.
तर सेल्फी पॉइंटवर फोटो घेऊन नागरिकही मतदार जागृती करत आहे. सेल्फी काढू मतदानही करु!, माझे मत माझे भविष्य.., मताचा अधिकार लोकशाहीचा सन्मान… आदी घोषवाक्य सेल्फी पॉइंटवर लिहिण्यात आलेले आहे.