स्वतंत्र काश्मीर पर्याय सुचविणें ह्यांत अब्दुल्लांचें चुकलें नाहीं
सार्वमत पाकच्या बाजूने होण्याची भीती
नवी दिल्ली, ता. 2 : काश्मीरमध्ये सार्वमत घेतलें तर जनता पाकच्या बाजूनें मत देईल अशी भीती वाटल्यानें आणि त्यास तर त्यांचा विरोध असल्यानें स्वतंत्र काश्मीरची कल्पना शेख अब्दुल्लाचें मनांत आली असें आज येथे भाषण करतांना काश्मीर राष्ट्रीय परिषदेचें सरचिटणीस मौलाना मसुदी ह्यांनीं सांगितलें.
अमेरिकेविरुद्ध नुसते अंदाज
शेख अब्दुल्लांची पदच्युती आणि अटक हें काहीं मंत्री आणि काश्मीर सरकारचे अधिकारी ह्यांचे कटाचे पर्यवसान होय असें सांगून ते म्हणाले, “”शेख साहेबांनी मदतीसाठी पाककडे डोळे लावले होते असें कोणीहीं म्हणू शकणार नाहीं. तसेच मि. स्टिव्हन्सन अगर मि. डल्लस ह्यांनीं स्वतंत्र काश्मीरची कल्पना त्यांचें डोक्यात भिनवली हेही नुसते अंदाज आहें. त्यास पुरावा काहीं नाहीं. भारत अगर पाकशी संलग्न होणें हे दोनच पर्याय जनतेपुढें ठेवण्याऐवजी स्वतंत्र काश्मीर हा तिसरा पर्याय ठेवणें ह्यात चूक कोणती आहे. शेख अब्दुल्लांची पंतप्रधानकीवरून उचलबांगडी लोकशाही विरोधी स्वरूपाची आहें”
कोरियन राजकीय परिषदेंत “”दिरंगाई” चालणार नाहीं – मि. डल्लस
सेंट लुई, ता. 2 : कोरियन राजकीय परिषदेंत अमेरिका “बेमुदत’ भाग घेऊ शकणार नाहीं अशी धमकी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मि. डल्लस ह्यांनीं आज येथें एका भाषणांत कम्युनिस्टांना दिली.
भारतास विरोध का?
कोरियन परिषदेंत भारतास प्रतिनिधित्व देण्यास अमेरिकेनें का विरोध केला त्याचे स्पष्टीकरण करतांना ते म्हणाले, “”शस्त्रबंदी कराराप्रमाणें दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांची परिषद बोलवावयाची होती आणि भारत कोणत्याही बाजूने नव्हता. आपण कम्युनिस्टांच्या बाजूने आहो असें भारत सरकार सांगत नाही. त्याचप्रमाणे कोरियातील आक्रमणास विरोध करणाऱ्या राष्ट्रांच्या गटातही भारत येत नाहीं. म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. भारताविषयी आम्हाला आदर आहें आणि आम्हाला भारताची मैत्रीही हवी आहें. आमची इच्छा आम्ही निरनिराळ्या मार्गांनी व्यक्त केली आहें.
इंडो-चीन
कोरियाप्रमाणें इंडो-चीनमध्ये कम्युनिस्टांनी दुसरें आक्रमण करू नयें; त्याचे परिणाम फार भयंकर होतील आणि ते इंडो-चीन पुरते मर्यादितही राहणार नाहीं असा इषारा त्यांनी कम्युनिस्टांना दिला.