नेहरूंची सेवानिवृत्ती जनमनावर अवलंबून
कलकत्ता, ता. 15 – पंतप्रधानकीचा काही काळ त्याग करून विश्रांती घेण्याचा पं. नेहरू यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी होणे न होणे जनमनावरच अवलंबून आहे. खुद्द पंतप्रधान नेहरू यांना जनतेचा कौल हवा आहे. आपल्या मनची ही गोष्ट पं. नेहरू यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितली.
राज्याचे पंतप्रधान व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांची यासंबंधीची मते सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, मी माझ्या सहकाऱ्यांना यासंबंधी स्थूलमानाने कल्पना दिली आहे, पण जनतेपुढे मन उघडे करणे मला इष्ट वाटते. विश्रांती घेऊन देशाच्या प्रश्नांवर चिंतन करण्याची माझी इच्छा आहे, पण या महत्त्वाच्या गोष्टी असल्याने अखेरी निर्णय घेण्यापूर्वी जनता जनार्दनापुढे त्या मांडल्या पाहिजेत. महत्त्वाचे निर्णय जनतेवर लादून उपयोगी नाहीत त्यांच्यापुढे ते विचारार्थ ठेवले पाहिजेत, असेही
पं. नेहरू म्हणाले.
नेहरूप्रेमी जनता!
कलकत्ता – पंतप्रधान नेहरू आजारी असून ते कुठल्याच कार्यक्रमास हजर राहणार नाहीत असे जाहीर केले असूनही नेहरूप्रेमी जनतेने त्यांच्या दर्शनार्थ इकडेतिकडे धावपळ केलीच. पंडितजी जेथे जेथे जाणे संभवनीय वाटले तेथे तेथे लोकांचे थवे दर्शनाच्या वेड्या आशेने तिष्ठत होते.
एके ठिकाणी मात्र जनतेची इच्छा पुरी झाली. भक्तांची प्रार्थना ऐकून ईश्वर धावावा तसे नेहरू अचानक दिसले. प. बंगाल सरकारच्या सचिवालयांस भेट देण्यासाठी ते आले होते.
गोव्यात युद्ध तयारी
बेळगाव – गोवा आता संपूर्ण लष्करी तळ बनला असून पोर्तुगालहून गोव्याकडे सैनिक व युद्धसाहित्याची सारखी आवक सुरू आहे. टिमारे सेर्पापिंटो नामक जहाजातून नुकतेच 2000 सैनिक आले आहे. गोव्यात लष्करी गाड्यांची धावपळ चालू असून अरुंद रस्त्यातूनही चिलखती गाड्या फिरतात. त्यामुळे तेथील शांततामय वातावरण नष्ट झाले आहे.