मुंबई : सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने तपास यंत्रणांचागैरवापर करून विरोधकांना टार्गेट करण्यात येत असल्याचे विरोधी पक्षांकडून गंभीर आरोपही करण्यात नेहमी करण्यात येतात. त्याचेच पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटत असताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर तपास यंत्रणांच्या चौकशीवरूननिशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी, ‘सगळा हिशोब इथेच होतो’ असे खडसावून सांगितले.
अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरु असताना आपल्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचे अनिल परब सभागृहाला सांगितले. “जे लोक सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आलेत, त्यांचं ठीक आहे. आपण रस्त्यावर मारामारी करून, भानगडी करून, आंदोलन करून, पोलिसांचा मार खाऊन इथे आलोय. माझ्या बाबतीत काही हरकत नाही. आम्हाला उचला, टाका आत. पण कुटुंबाला भोगायला लावू नका”, असा विनंतीवजा इशारा सरकारला दिला.
दरम्यान, विरोधी बाकांवरून कुणीतरी प्रसाद लाड यांचा उल्लेख करताच अनिल परब यांनी त्यांना टोला लगावला. “लाडांकडे सोन्याचा नाही, प्लॅटिनमचा चमचा आहे. तो चमचा सगळ्या भांड्यांमध्ये चालतो. कोणत्याही पक्षाचं भांडं असू देत. त्यांचा चमचा चालतो”, असे परब यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
अनिल परब यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा देत,“आज तुम्ही म्हणाल जशास तसं. आज आमचं कुटुंब भोगतंय. पण तुमच्या कुटुंबाला असंच भोगायला लागू नये अशी मी इश्वरचरणी प्रार्थना करतो. कुटुंबाला भोगायला लावू नका. तुमचेही मुलं-मुली शाळेत जातायत. त्यांना जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवून चार चार तास बसवून ठेवलं जाईल, तेव्हा तुम्हाला कळेल त्याचं काय असतं ते. पोलीस आल्यानंतर माझ्या मुलीला विचारतात तुझा बाप कुठे बसलाय? एक लक्षात ठेवा, जशास तसं असतं, इथेच त्याचा हिशोब होऊ शकतो”, असे अनिल परब म्हणाले.