Thackeray Group | Uddhav Thackeray – महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे पुन्हा वापस आणू, राज्याचे वैभव पुन्हा मिळवून देऊ, राज्यातील तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळवून देऊ, प्रत्येक जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आणून रुग्णसेवा चांगली केली जाईल.
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करून पीकवीमा योजनेचे निकष बदलून टाकू ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी वचननामा जाहीर करताना केली.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते व संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा (ठाकरे गट) वचननामा जाहीर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पर्यावरण स्नेही उद्योग राज्यात आणू. तर पर्यावरणाला घातक असलेल्या प्रकल्पांना आमचा विरोध कायम राहणार आहे. विशेष करून केंद्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुढील पाच वर्ष स्थिर कशा राहतील, यासाठी आग्रही राहणार आहोत.
तर संविधानाचे रक्षण करणे ही आमच्या सरकारची प्राथमिकता असेल. एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी इंडिया आघाडी म्हणून व एक मित्रपक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोदी-शहा महाराष्ट्रद्वेषी आहेत
मोदी-शहांच्या मनात महाराष्ट्रद्वेष आहे. त्यांची सत्ता जाणार असल्याने ते रामराम करत आहेत. पण आमच्या गीतात भवानी मातेचे नाव आले तर यांना त्रास होतो.
कारण मोदी शहा यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही. ते अजूनही तुळजाभवानी मातेच्या मंदिरात का गेले नाही, असे म्हणत ठाकरेंनी भाजप नेत्यांना टोला लगावला.