जामखेड -जामखेड शहरातून जाणाऱ्या नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत दरावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त होत असून, तत्काळ हे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
जामखेड ते नगर व जामखेड ते बीड या मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होईल, अशी आशा जामखेडकरांना होती. मात्र आज राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळूनही या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, हे विशेष. मागील अनेक वर्षांपासून याबाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
जामखेड हे मराठवाड्याचे प्रवेशव्दार असल्याने या ठिकाणाहून वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. त्यातच पावसामुळे या मार्गावरील खड्डे वाढून ते आता एक ते दोन फुटांपर्यंत खोल झाले आहेत. नगर ते जामखेड ते मोहा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 हा उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग उपविभाग नगर यांच्या अंतर्गत आहे, तर जिल्हा हद्द मोहा ते बीड हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी हा रस्ता उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीड यांच्या अंतर्गत येत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयांचे दुर्लक्ष झाले असून, ही बाब गांभीर्याने घेवून जामखेड-बीड मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी संजय कोठारी यांनी केली आहे.
याबाबत कोठारी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नगर उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता दिलीप तारडे व याच विभागाचे बीड उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता राजेंद्र भोपळे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेवून येत्या आठ दिवसांत खड्डे बुजविणार असल्याचे सांगितले.