पिंपरी – महापालिकेच्या वतीने नवी दिशा अंतर्गत शहरातील झोपडपट्टीत शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भोसरी येथील गवळीमाथा झोपडपट्टीमधील दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर शहरातील सात प्रभागातील 10 झोपडपट्यामध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पालिकेने पाऊले उचलली आहेत. पुढील महिन्यात या उपक्रमाला सुरूवात करण्याचे नियोजन असल्याचे आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात घोषित आणि अघोषित अशा 72 झोपडपट्या आहेत. झोपडपट्टी परिसरामध्ये निर्माण झालेला कचरा त्याच ठिकाणी अथवा परिसरामध्ये जिरवणे, विल्हेवाट लावणे किंवा त्यापासून खतनिर्मिती करणे अशी शून्य कचरा संकल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित महापालिकेतर्फे शून्य कचरा उपक्रमाच्या अंतर्गत क प्रभागामध्ये गवळीमाथा झोपडपट्टीतील सुरू केला. घरांमध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचा प्रकल्प महिला बचत गटातील महिलांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प उद्यानात सुमारे एक वर्षापूर्वी सुरु केला आहे. शून्य कचरा संकल्पनेमुळे झोपडपट्टी भागातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. गवळीमाथा झोपडपट्टी ही शून्य कचरा उपक्रम यशस्वी पद्धतीने राबविणारी महाराष्ट्रातील पहिली झोपडपट्टी ठरली आहे.
दरम्यान, हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर पालिकेने इतर सात प्रभागांतील दहा झोपडपट्यांमध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी काही क्षेत्रीय कार्यालयात जागाही निश्चित केल्या असून काहींच्या जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
एका बचत गटाला पाचशे घरांचे काम
गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये 374 कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळे येथील एका महिला बचत गटाला काम देण्यात आले आहे. पुढील महिन्यात शहरातील सात प्रभागातील 10 झोपडपट्यामध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मात्र, काही झोपडपट्यांमध्ये कुटुंबाची संख्या जास्त असली तरी 500 कुटुंबाचा कचरा संकलनाचे काम एका गटाला देण्यात येणार आहे. त्यामुळे एका झोपडपट्टीत कुटुंबाच्या संख्येनुसार तीन ते चार बचत गटांना काम देण्यात येणार आहे.
या झोपडपट्टीत राबविणार उपक्रम
मोरवाडीतील विद्यानगर, रावेतमधील सिध्दार्थनगर, पिंपळे निलखमधील अण्णाभाऊ साठे, भोसरीतील शांतीनगर, कृष्णानगरमधील दुर्गानगर, पिंपरी, शास्त्रीनगर येथील शास्त्रीनगर, बलदेवनगर, कैलासनगर, दापोडीतील आनंदवन काटे वस्ती आणि फुगेवाडी येथील संजयनगर अशा 10 झोपडपट्यांमध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
गवळीमाथा येथे शून्य कचरा उपक्रम यशस्वी झाला आहे. शून्य कचरा उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातील पहिली झोपडपट्टी ठरली आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संवर्धन आणि महिलांचे स्वावलंबन घडवून आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आयुक्तांनी इतर सातही प्रभागात हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता सात प्रभागातील 10 झोपडपट्यांमध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
– यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग