नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये एकदाही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा बोझा कमी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील ऐतिहासिक सत्ता बदलानंतर शिवसेनेने भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली. यासाठी शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडले. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे दोन मंत्रिपदे रिक्त झाली. या सर्व घडामोडीत आता महाराष्ट्राच्या वाट्याला असलेले मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
नारायण राणेंना दिल्लीहून तातडीने फोन आला असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे राणे उद्याच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील.
महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्याने अंगावर घेण्याचे काम राणेंनी केले आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.