राजगुरूनगर – मी घरी आलो तर तुमचा, नाहीतर शेतकऱ्यांचा. साडेचार तासांच्या थरारानंतर अखेर आंदोलक पाटीलबुवा गवारी यांची मनधरनी करून आणि प्रांत साहेब स्वतः येऊन चर्चा करण्याचे सांगितल्यानंतर व त्यांच्यासह आंदोलकांवर कोणताही गुन्हा दाखल न करण्याचा आश्वासनानंतर अखेर पाटील बुवा गवारी टाकीवरून खाली उतरले.
खेड प्रांताधिकारी कार्यालयासमोर तालुक्यातील १२ गावातील शेतकऱ्यांचे ज्ञानेश्वरी वाचन व चक्री उपोषण सुरू आहे. मात्र राज्य सरकार व स्थानिक अधिकारी दखल घेत नसल्याने आज (दि.६) सकाळी ६वाजता रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/516964802883794
घटनास्थळी आंदोलक गवारी यांच्या पत्नी पसच्या माजी सभापती कल्पना गवारी, त्यांची दोन मुले व बाधित शेतकरी आले त्यांनी पाटील बुवा गवारी यांना खाली येण्यासाठी विनंती केली.मात्र जोपर्यंत प्रांताधिकारी चर्चेला येत नाही तोपर्यंत खाली येणार नाही अशी पवित्रा घेतली.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/204947668083289
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,नायब तहसीलदार संजय शिंदे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी पाटीलबुवा गवारी यांना खाली येण्यासाठी सांगितले. मात्र ते निर्णयावर ठाम होते. यावेळी कल्पना गवारी यांनी आक्रमक भूमिका घेतली. माझ्या नवऱ्याचं बरं वाईट झाल्यास सर्वस्वी शासन जबाबदार आहेत प्रांताधिकार्यानी तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्याशी चर्चा करावी. प्रांताधिकारी येत नसल्याने अखेर कल्पना गवारी यांना घेऊन डीवायएसपी लंभाते, तहसीलदार डॉ वाघमारे, पोलीस निरीक्षक गुरव हे प्रांत कार्यालयात गेले तेथे चर्चा केल्यानंतर अखेर प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण घटनास्थळी आल्यानंतर त्यांनीही गवारी यांना टाकीवरून खाली येण्याची व चर्चा करण्याची विनंती केली मात्र ते त्यांच्या मागण्यांवर ठाम होते अखेर त्यांचे आंदोलक सहकारी टाकीवर गेले त्यांनी विनंती केली मात्र खाली येण्यास नकार दिला अखेर बळजबरीने पाटील बुवा गवारी यांना खाली आणण्यात आले.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/606887826951194
त्यानंतर प्रांत कार्यालयात चर्चा करण्यात आली मागण्या लेखी स्वरूपात द्या त्या वरिष्ठांना कळवू त्यांना आंदोलनाची सर्व कल्पना दिली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत पुढचा निर्णय जिल्हाधिकारी देतील आंदोलन मागे घ्यावे असे प्रांत अधिकारी चव्हाण यांनी आंदोलकांना सांगितले. तर तोडगा निघाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा आंदोलन कर्त्यांनी इशारा दिला.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2135774783230193