मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ताशेरे ओढताना अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात असा टोला लगावला होता. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश राणेंचा समाचार घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत असे म्हणत खरपूस समाचार घेतला आहे.
निलेश राणे यांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. “निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत,” असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
“निलेश राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
दरम्यान, “अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार,” असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.