Ashok Chavan – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबाबतीत मोठी बातमी समोर आलीय. अशोक चव्हण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘भाजपाला असं वाटत असेल की या निर्णयामुळे आपण सेफ होऊ. मात्र मला हे फार कठीण वाटतं. याचं कारण असं की, एखादी नेता त्या पक्षाला सोडून गेला कि त्या व्यक्तीलाच फार त्रास होतो. आमच्याकडे असलेले अनेक आमदार, मंत्री होते हे देखील आम्हाला सोडून गेले.
मात्र पक्ष म्हणून त्याचा फार परिणाम झाला, असे नाही. सोडून गेलेल्या व्यक्तीच्या जवळचे मित्र किंवा संपर्कात असलेले तेच फक्त त्या ठिकाणी जात असतात. मात्र पक्ष हा कायम होता तिथेच असतो. त्यामुळे एखाद दुसरा व्यक्ती जाणं हे धक्कादायक आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र त्याच्या जाण्याने पक्षाला फरक पडतो, असे अजिबात नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजपवर केला जोरदार हल्लाबोल –
ते पुढे म्हणाले, “मला व्यक्तिगत असे वाटत नाही की या सर्व परिस्थितीचा मतदानावर परिणाम होईल. राज्यात 60 ते 70 टक्के लोकांनी आपले मत कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही, याबद्दल विचार करून ठेवलेला आहे. भाजपला वाटतं तसं होईल असे अजिबात नाही.
मी यापूर्वी देखील अनेकदा म्हणालो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहे. ईडीच्या चौकशीवर त्यांना हवे त्याने ते नाचवणार. मग ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ असतील किंवा तळागाळातील असतील. त्यांना ते नाचवल्या शिवाय राहणार नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
नाना पटोलेयांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज –
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगितले जाते.
प्राप्त माहितीनुसार, अशोक चव्हाण हे काल काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांची देहबोली फारशी चांगली दिसत नव्हती. परवा त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील बैठकीला दांडी मारली होती. गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते.
याठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. आज भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये चव्हाणांच्या नावाची शक्यता आहे.