नवी दिल्ली – देशातील लोकांना रोजगार मिळत नाही आणि महागाईमुळे या लोकांच्या पाकिटावरच रोज डल्ला मारला जात आहे अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रावर जोरदार निशाणा साधला.छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ दरम्यान एका मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. विविध स्वरूपाचे खोटे दावे करून लोकांची दिशाभुल केली जात आहे त्यामुळे लोकांनीच आता जागे राहण्याची गरज आहे असे आवाहनही त्यांनी केले.
मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी हे देशाच्या लोकसंख्येच्या ७४ टक्के इतके आहेत, परंतु या समुदायातील एकही व्यक्ती भारतातील सर्वोच्च २०० कंपन्यांचा मालक किंवा व्यवस्थापनात नाही ज्यांना मोदी सरकारकडून देशाचा सर्व पैसा दिला जात आहे , असा दावा त्यांनी केला.
भाजप याला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणतो, पण देशातील ७४ टक्के लोकसंख्या आणि गरिबांना त्यातून काहीच मिळालेले नाही. त्यांच्यासाठी हे लोक म्हणजे केवळ “घंटा” वाजवणे, थाळी वाजवणे, सभांमध्ये मोबाईल फोन चमकवणे आणि उपासमारीने मरणे यासाठीच आहेत, असा पलटवारही त्यांनी केला.
ते म्हणाले की, मला सांगा, गेल्या महिन्यात अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी तुम्ही कोणी गरीब, मजूर, बेरोजगार व्यक्ती किंवा छोटे व्यापारी पाहिले आहेत का? मी फक्त तेथे अदानी, अंबानी, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि इतर मोठे उद्योगपती पाहिले. लोकांना रोजगार मिळत नाही आणि बिकट आर्थिक स्थितीत त्यांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे, अशा काळात अदानी आणि अंबानी चिनी वस्तू विकून नफा कमवत आहेत असा आरोप काँग्रेस नेत्याने केला.