पुणे – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याचे आणि दोन जागांवर पराभव झाल्याचे खापर सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांवर फोडले आहे. अधिकारी काम करत नसल्यामुळेच मतदारांची नाराजी भोवली, यापुढे असा कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमच स्थायी समिती अध्यक्षांसह भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होती. समितीचे अध्यक्ष आणि निर्वाचित आमदार सुनील कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता समितीची बैठक सुरू झाली.
हंगामी आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्यासह जवळपास सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
कारणमिमांसा करण्याचे आदेश
दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन विधानसभा मतदार संघातील पराभव आणि सहा मतदार संघांत घटलेल्या मताधिक्यावर नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. एवढेच नाहीतर याची कारणमिमांसा करण्याचे आदेशही पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरून पुढे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची दिशा स्पष्ट केली.
…तर आमच्याशी गाठ आहे
बैठक सुरू होताच सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तुम्ही कामे करत नसल्याचा परिणाम पक्षाला निवडणुकीत भोगावा लागला. आमदारकीच्या दोन जागा कमी झाल्या तर उर्वरित सहाही मतदार संघांत मताधिक्य घटले, असेही अधिकाऱ्यांना सुनावण्यात आले. यापुढे विकास कामात दिरंगाई झाल्याची कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. नियोजित कालावधीतच सांगितलेले काम झाले नाही तर, आमच्याशी गाठ आहे, असा इशारेवजा दमच सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला. प्रामुख्याने पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते या विभागांवरून सदस्य अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काहींनी तर भामा आसखेड प्रकल्प, चोवीस तास पाणीपुरवठा या योजनांना विलंब होत असल्याकडे ही समिती अध्यक्ष कांबळे यांनी लक्ष वेधले.