पिंपरी – हुंड्याच्या कारणावरून तसेच किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून नवविवाहित महिलेने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोशी येथे घडली.
सायली सुनील कदम (वय 22 रा. सिद्धेश्वर नगर, मोशी) असे मयत तरुणीचे नाव असून तिच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून पती सुनील रामलिंग कदम, सासरे रामलिंग कदम, सासू आदिका कदम, दिर सचिन कदम व सतीश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायली व सुनीलचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी सायलीचा विविध कारणांवरून छळ सुरू केला. माहेरच्या मंडळीकडे असलेली जमीन आमच्या नावावर करून द्यावी, लग्नात मुलाला कपडे, दागिने व पैसे दिले नाहीत तसेच फ्रीज, टिव्ही अशा वस्तू दिल्या नाहीत म्हणून सातत्याने छळ सुरू केला. याशिवाय घरगुती किरकोळ कारणावरूनही सायलीला त्रास देत मारहाण केली.
घरखर्च भागविण्यासाठी सायलीने कामाला जावे व एमपीएससी परिक्षा द्यावी यासाठीही आरोपींनी सायलीला मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून सायलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.