मुंबई – राज्यातील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5 कोटी रुपयांच्या बदनामीची नोटीस पाठवली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप केल्याबद्दल खान यांनी भरपाईची मागणी केली आहे. याशिवाय लेखी माफी मागण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. मात्र, समीर खान यांनी पाठवलेल्या या नोटिसीला प्रत्युत्तर दिले जाईल, असे भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी 10 नोव्हेंबरच्या या नोटिसीची छायाप्रत आज ट्विटरवर पोस्ट केली आहे. “खोटे आरोप जीवन उद्ध्वस्त करतात. आरोप करण्यापूर्वी अथवा काहीही टीका करण्यापूर्वी आपण कशाबद्दल बोलतो आहोत, हे माहीत करून घ्यावे.’ असे त्यांनी ट्विटरवरच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.
समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जानेवारीमध्ये अटक केली होती. मात्र, पुरेशा पुराव्याअभावी त्यांना सप्टेंबर महिन्यात जामीन मंजूर झाला आहे. “एनसीबी’ने खान यांना ड्रग्जच्या व्यवहाराच्या या प्रकरणात गोवले आहे. जुलैमध्ये आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे खान यांच्या वकिलांनी नोटिसीमध्ये म्हटले आहे. समीर खान यांच्या घराची तपासणी केल्यावर कोणतेही ड्रग्ज सापडले नव्हते. समीर खान यांचा वारंवार मानसिक छळ केला जात आहे. त्यांच्याबरोबर संपूर्ण कुटुंबाची बदनामी केली जात आहे, असेही या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
मलिक यांच्या जावयांच्या ताब्यात ड्रग्ज सापडले होते. ज्यांच्या घरात ड्रग्ज सापडले होते, त्यांची पार्टी कशी असेल, असा प्रश्न फडणवीस यांनी केला होता.