काबुल – अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जागतिक दहशतवादासाठी होता कामा नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्या देशात सर्वसमावेशक सरकार स्थापन होणे गरजेचे आहे, असे भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक जाहीरनाम्यात म्हटले आहे. भारत, रशिया, इराण व इतर पाच मध्य आशियायी देशांनी या उद्दिष्टांवर सामुदायिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भारताने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल तालिबानने आनंद व्यक्त केला आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी यात लक्ष घातले होते. भारताने बुधवारी सुरक्षा सल्लागार अर्थात एनएसए स्तरावर इतर सात देशांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमुळे अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यास मदत होणार असल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की तालिबान याकडे सकारात्मक घडामोड म्हणून पाहतो. त्यामुळे शांतता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या आणि देशातील गरिबी हटवण्यात मदत करणाऱ्या कोणत्याही उपक्रमाला तालिबानचा पाठिंबा असेल. देशाची पुनर्रचना, शांतता आणि स्थिरता यासाठी काम करतील, तर हेच आमचे उद्दिष्ट आहे. अफगाणिस्तानच्या लोकांना शांतता आणि स्थैर्य हवे आहे कारण त्यांनी गेल्या काही वर्षांत खूप त्रास सहन केला आहे. सध्या आम्हाला देशातील आर्थिक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत आणि नवीन प्रकल्प सुरू करायचे आहेत. तसेच आपल्या लोकांना नोकऱ्या हव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीत जे मुद्दे मांडले गेले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत,असे शाहीन म्हणाले.