पुणे – पद्मश्री पुरस्कारप्राप्त अभिनेत्री कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्यांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेध व्यक्त करीत, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक कॉंग्रेस पर्वती मतदारसंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रसचे सचिव अक्षय जैन यांनी मार्केडयार्ड पोलीस स्टेशनकडे दिले आहे. अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह वक्तव्य करून देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्वांचा अपमान केला आहे. 1947 साली देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले आहे, असे वक्तव्य केले आहे. हे विधान समस्त भारतीयांचे मन दुखावले आहे. या वक्तव्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा, जवानांचा देखील अपमान झाला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
या वक्तव्याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन कंगना राणावत यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अक्षय जैन यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शर्वरी गोतरणे, भरत सुराणा, सुरेश चौधरी, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, अविनाश गोतरणे प्रदीप ठोंबरे आदी उपस्थित होते.