सातारा -महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यापासून केवळ जनतेच्या फसवणुकीचा कार्यक्रम राबवला जात आहे. मराठा, धनगर आरक्षणासह सिंचन योजनांची कामे मार्गी लावण्यात या सरकारला अपयश आले असतानाही वर्षपूर्तीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. ही सरकारची वर्षपूर्ती नसून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती असल्याची टीका आ. रणजित मोहिते-पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपची भूमिका मांडण्यासाठी साताऱ्यात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व पदाधिकारी उपस्थित होते.
मोहिते-पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केवळ फडणवीस सरकारच्या काळातील योजनांना स्थगिती देणे, त्यांची नावे बदलणे, यापलीकडे कोणतेही काम झाले नाही. सरकार करोनाची सबब पुढे करत असले तरी आधीचे चार महिने करोना नसताना सरकारने काय केले? मराठा आरक्षणावरून सरकारने समाजाची व या समाजातील तरुणांची मोठी फसवणूक केली आहे. तसाच प्रकार धनगर आरक्षणाबाबत केला आहे. करोनाच्या काळात उपाययोजना करण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे.
नागरिकांचे स्थलांतर करताना सरकारकडून ठोस नियोजन केले गेले नव्हते. त्याचा त्रास परराज्यातील लोकांना सहन करावा लागला. करोनाचे संकट ही संधी मानून या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. वीज बिलांबाबतही सरकारने ठोस उपाय न केल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे; परंतु सरकारमधील मंत्र्यांना जनतेशी देणेघेणे नाही.
या मुद्द्यांवरून सरकारच्या कारभाराचे वाभाडे
महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा बट्ट्याबोळ, मराठा आरक्षण, करोना काळात, अतिवृष्टीच्या काळातील अपयश, सरकारमधील धूसफूस, निर्णयांना विलंब, जुन्या सरकारच्या निर्णयांना दिलेली स्थगिती, जलयुक्त शिवार, भ्रष्टाचार या मुद्द्यांच्या आधारे मोहिते-पाटील यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.