सातारा – मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणीही ठोस भूमिका घेतली नाही. केवळ मतांसाठी वापर करुन मराठा समाजास झुलवत ठेवण्याचे काम करणाऱ्यांनी निदान आता तरी झालेल्या चुका सुधारण्याची गरज आहे. आता समाज गप्प बसणार नसून सरकारने मराठा आरक्षण न दिल्यास जनतेतून उद्रेक होऊन सत्ताधाऱ्यांना घरातून बाहेर पडणेही मुश्किल होईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, ज्यांच्या हातात महाराष्ट्राज्याची नेहमी सत्ता राहिली, ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं, मंडल आयोगाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आम्ही त्यांच्या अनुभव, वयाचा नेहमीच आदर करतो. मात्र, मराठा समाजास आरक्षण न मिळण्यास तेच कारणीभूत आहेत, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी केली.
खा. उदयनराजे म्हणाले, इतर समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण मिळाले त्याप्रमाणे मराठा समाजाचीही आरक्षणाची जुनी मागणी आहे. अन्य काही समाजही आरक्षण मागत आहेत. लोकशाहीने दिलेला तो अधिकार असून आम्ही कुणाचे हिसकावून मागत नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विषय आला की सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले.
सध्याच्या सरकारने न्यायालयात याबाबत भूमिका मांडून समाजबांधवांना न्याय देण्याची गरज आहे. मात्र, सरकारचा वकीलच न्यायालयात सुनावणीस हजर राहत नाही, ही बाब निश्चितच समाजासाठी धोकादायक आहे. आजपर्यंत जातीजातीत भांडणे लावून काही लोकांनी राजकारण केले. मात्र, यापुढे असे त्यांना करता येणार नाही. समाज आता जागृत झाला असून जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्नशील असून आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली, आंदोलने केली, मोर्चे काढले की अन्य समाजाला प्रतिमोर्चे काढायला लावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक अन्य समाजाचे आरक्षण काढून आम्ही आरक्षण मागत नाही. मात्र लोकांच्या डोळ्यात धुळफेक करुन समाजासमाजात वादंग पेटवण्याचे काम काही लोकांकडून होत आहे. मात्र, आता मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका जाहीर करुन तात्काळ आरक्षण द्यावे अन्यथा लोकांची रिअँक्शन दिसून येईल.
मग सत्ताधाऱ्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल होईल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या बाजूने राहणाऱ्या उमेदवारांना साथ द्या, असे आवाहन करुन उदयनराजे म्हणाले, एकीकडे मराठ्यांचे कैवारी, स्ट्रॉंगमॅन म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे आरक्षणात खोडा घालायचे असले आता चालणार नाही. ज्यांनी मानपान दिले, मानसन्मान दिला, विश्वास ठेवला अशा लोकांचा विश्वास उडाला तर लोक तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत, याचे भान संबंधितांनी ठेवण्याची गरज आहे.
मराठा आरक्षणावरुन दुसऱ्याकडे बोट दाखवायचे उद्योग त्यांनी आता बंद करावेत. आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवून सरकार विविध प्रकारची भरती प्रक्रिया राबवण्याच्या तयारीत आहे. ही प्रक्रिया राबवायला आमचा विरोध नाही, मात्र मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवूनच निर्णय घ्यावा. विविध प्रकारच्या परीक्षा घेताना मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्याप्रमाणे अनेक जण मराठा समाजातील मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनी समाजाचा फक्त वापर केला असा आरोपही उदयनराजे यांनी यावेळी केला.
मराठा खासदार, आमदारांनी एकजूट दाखवावी
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि दुसरीकडे एखाद्या समाजाला दाबण्याचे काम करायचे, हे योग्य नाही. मराठा आरक्षण किती दिवस आम्ही मागायचे आता ते हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. मी मराठा समाजात जन्माला आलो म्हणून मराठा आरक्षणाची मागणी करत नाही. आरक्षण हा सर्व समाजाचा हक्क आहे. इतर समाजांनाही आरक्षण मिळाले आहे. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला जात आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लोकसभा, राज्यसभेतील खासदार, विधानसभा, विधान परिषदेतील मराठा समाजाच्या आमदारांनी आरक्षणासाठी एकत्र आले पाहिजे. आम्हाला दुसऱ्या कोणाचे नको तर आमच्या हक्काचे आरक्षण द्या, अशी मागणी सर्वांनी धसास लावावी, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.
संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा, बघा कसे आरक्षण मिळते
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी खा. उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी एकत्र बसून मराठा समाजाचा प्रश्न मिटवावा, असे आवाहन केले होते. याबाबत उदयनराजे म्हणाले, आम्ही सर्वजण मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र आहे. मराठा समाजच नव्हे तर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तर मी आवाज उठवत असतो. आमच्यात फूट पाडण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही. छत्रपती संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा, मग बघा कसे लगेच आरक्षण मिळतेय. सत्ताधाऱ्यांनी “जनाची नाही मनाची लाज बाळगावी’. जातीचे राजकारण करायचे असेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा. छत्रपती संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर असतील तर आरक्षणासह सर्व विषय तात्काळ मार्गी लागतील. आमच्या खांद्यावर किती दिवस बंदूक ठेवणार, तुम्ही घ्या की बंदूक हातात, असा टोलाही खा. उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.