Inspirational thoughts by Sudha Murthy – सुधा मूर्ती या प्रेरणादायी व्याख्याता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर अनेक प्रेरणादायी वाक्प्रचार, म्हणीचा त्या वापर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी करत असतात. त्याचबरोबर अतिशय प्रेरणादायी लिखाण करणाऱ्या लेखिका आणि विविध संस्थांना सढळ हस्ते मदत करणाऱ्या दात्या म्हणूनही त्यांची ओळख आहे.
सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा आहेत. त्या इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. त्या कादंबरीकारही आहेत. 2006 मध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.
त्या म्हणतात, स्वतःमध्ये जिद्द आणि चिकाटी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समोर येणारी आव्हाने आणि अडचणींकडे पाहताना वैयक्तिक विकासासाठीची संधी म्हणून पहावे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील ध्येय निश्चित करावे आणि त्याकडे वाटचाल करताना आपल्या जगण्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या भाषणामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या विविध घटना घडामोडी आणि उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळते. स्वतःचे मूल्यमापन करण्याची दिशा सापडते. तसेच अभ्यासातही प्रोत्साहन मिळते.
सुधा मूर्ती यांचे असेच काही प्रेरणादायी विचार…
१) अपयशाला कधीही घाबरू नका. अपयश नेहमीच नवीन शिकण्याच्या आणि प्रगती करण्याच्या प्रक्रियेचा भाग असते. तुम्हाला जितके अपयश येईल तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल.
२) स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमचा जर स्वतःवरच विश्वास नसेल तर तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार ना.ही त्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास असू द्या. स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखा.
३) आयुष्य ही एक परीक्षा असते. परंतु इथे कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला नसतो किंवा प्रश्नपत्रिकाही सेट केलेल्या नसतात. या परीक्षेत तुम्हाला कुठेही आदर्श उत्तर पत्रिकाही मिळणार नसते.
४) स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि प्रत्येकांमध्ये वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये आणि कौशल्ये असतात. प्रत्येकाच्या क्षमताही वेगळ्या असतात. त्यामुळे स्वतःच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करा. बाकीचे काय करत आहेत याची काळजी करू नका.
५) कधीही शिकणे थांबवू नका. सतत नवनव्या गोष्टी शिकत रहा. कौशल्ये आत्मसात करा. कारण हे जग सतत बदलत आहे. उत्क्रांत होत आहे. त्यामुळे त्या जगाशी मिळतेजुळते घेण्यासाठी तुमच्याकडे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक असते. तुम्ही जितके जास्त शिकाल तितके तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता वाढत जाते.
६) आपले भविष्य काय आहे, याचा अंदाज बांधत बसण्यापेक्षा स्वतःचे भविष्य घडवण्यात माणसाचे हित असते.
७) स्वतःशी आणि इतरांशी देखील दयाळूपणाने वागा. सध्याच्या जगाला दयाळूपणा आणि अनुभूतीची गरज आहे. जगातील चांगुलपणाचे वाहक आणि शक्ती तुम्ही व्हा. लोकांच्या जीवनात बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करा.
८) कोणतीही कृती न करता दूरदृष्टी ठेवणे म्हणजे केवळ स्वप्नरंजन असते. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून त्या दिशेने वाटचाल करायची असेल तर कृती आवश्यक आहे. दूरदृष्टी आणि कृती एकत्रित आल्या तरच या जगात बदल घडू शकेल.