अफवांवर विश्वास ठेवू नका : तज्ज्ञांची माहिती
पुणे -“वृत्तपत्रांमुळे करोनाचा संसर्ग होत नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. हा व्यक्ती संक्रमित रोग असून, वृत्तपत्रांच्या कागदामधून तो होतो, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
करोना आजार मूलत: भारतात अन्य देशांमधून आला आहे. तो व्यक्तींकडून संक्रमित झाला आहे. त्यामुळे याची योग्य काळजी घेतली, तर ती ज्यांना याची लागण झाली आहे, त्यांच्याकडून तो पुढे संक्रमित होणार नाही. तसेच हा आजार हवेतून किंवा पाण्यातून पसरत नाही.
तसेच वस्तूंवर तो फार काळ जिवंत राहात नाही, त्यामुळे कागदावरून किंवा वृत्तपत्रांमधून तो पसरतो हे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे. या उलट माध्यमांमधून या रोगाविषयी जागृती होत असल्याने नागरिकांनी वृत्तपत्रांमधून ती माहिती घ्यावी, तसेच काळजी घेण्याविषयी जे आवाहन केले आहे, त्याची अंमलबजावणी करावी, असेही तज्ज्ञांचे सांगणे आहे.
केवळ वृत्तपत्रे न वाचणे किंवा घरी न आणणे करोनावरील उपाय नाही. आपण कळत न कळत मोबाइल, फोनचा रिसिव्हर, ग्रंथालयातील पुस्तके अशा अनेक गोष्टी वापरत असतो. त्यातूनही त्याचे संक्रमण होऊ शकते.
– डॉ. प्रदीप आवटे, आरोग्याधिकारी