केतकावळे – पुरंदर तालुक्यातील शेतकरी आपल्या पारंपरिक शेतीबरोबरच आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागले आहेत. पुरंदर तालुक्यातील बहुतांश शेतकरी फूल, फळ, शेतीबरोबरच आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. आपल्या पारंपारिक पिकाबरोबरच आता बटाटा हे पीक घेऊ लागले आहेत. विशेषत: पुरंदर तालुक्यात सोमरडी, नारायणपूर व कोडीत याठिकाणी शेतकरी बटाटा पिकांची लागवड केली आहे.
कोडीत खुर्द येथील शेतकरी शंकर खैरे यांनी आपल्या शेतामध्ये उभी आडवी नांगरट करून बटाटा या पिकाची लागवड नोव्हेंबरमध्ये केली होती. पिकाची योग्यवेळी पाणी, औषधे, फवारणी, खुरपणी करून पीक जोमदार येऊन आता काढणीला आले आहेत. सासवड बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीचा खर्च जास्त नाही. सध्या एक किलोला वीस रूपये बाजारभाव मिळत आहे. खर्च वजा जाता फायदा होईल, असे शेतकरी तानाजी शंकर खैरे यांनी सांगितले.
यावर्षी बियाणे खराब लागल्याने उत्पादन पन्नास टक्के घटले असल्याने एक किलो बियाणामध्ये बारा किलो उत्पन्न निघते. परंतु खराब बियाणामुळे एक किलोला सहा किलोच उत्पन्न मिळत आहे. त्यात बटाटा हे पीक थंडीत वाढणारे असून थंडी पडली नसल्याने रोगराई जास्त प्रमाणात आहे. 19-19, रासायनिक खते, शेणखत, किडीसाठी एम-45,मावा, तुडतुडे, हिरवी आळी, यासाठी इमीडा क्लोराईड हे औषधे वापरावे लागले. त्यामुळे खर्च जास्त आला आहे. मात्र, उत्पन्न कमी मिळत असल्याचे शेतकरी तानाजी खैरे यांनी सांगितले.