पाटणा – एक्झिट पोल चाचण्यांमध्ये बिहार मध्ये राजद-कॉंग्रेस महागठबंधनचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजदने आपल्या कार्यकर्त्यांना निकालाच्या दिवशी नाहक मस्ती करू नका, हवेत गोळीबारासारखे प्रकार करू नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
10 तारखेला जो काही निकाल येईल तो संयमाने स्वीकारा, साधेपणा आणि सौजन्यांचे वर्तन ठेवा अशी सुचनाही आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाने केली आहे.
आपल्या विरोधकांना खिजवण्यासाठी फटाके वाजवणे, हवेत गोळीबार करणे, भलताच उत्साह दाखवून बेशिस्त वर्तणूक करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असेही पक्षातर्फे कार्यकर्त्यांना बजावण्यात आले आहे.
मागे आपण असे काहीं प्रकार केले असतीलही पण आता आपल्याला नवीन संस्कृती रूजवायची आहे असेही पक्षातर्फे बजावण्यात आले आहे. बिहार प्रदेश राजदचे अध्यक्ष जगदानंद सिंह म्हणाले की, 10 तारखेला जो काही निर्णय येईल तो सर्वांनी नम्रपणे आणि संयमाने स्वीकारायचा आहे.
लालुप्रसाद यादव ही आपली आस्था आहे आणि तेजस्वी हे आपल्या व्यवस्थेचे केंद्र आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. तेजस्वी यादव यांनी लोकांचा विश्वास जपण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत आणि त्यांनी मिळवलेला हा विश्वास आपल्याला जपायचा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.